स्थानिक लोकप्रतिनिधी हणमंत जगदाळे यांचा सनसनाटी आरोप
ठाणे – शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेचे राखीव मोकळे भूखंड अनधिकृत गाळे आणि चाळी बांधून भूमाफिया गिळंकृत करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागातील अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची घणाघाती टिका या विभागाचे स्थानिक माजी जेष्ठ नगरसेवक, माजी विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास प्रभाग समितीवर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा हणमंत जगदाळे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेचे शास्त्रीनगर विभागात मोक्याच्या जागी मोकळे भूखंड आहेत. या भूखंडांवर भूमाफियांची गेल्या अनेक वर्षांपासून नजर आहे. या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी बारीक नजर ठेवली आहे. जेष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, डीपी रोडचे या भूखंडांवर नियोजन आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र तरी सुद्धा ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम होत असल्याने गत वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये स्थानिकांनी हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. अतिक्रमणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पालिका प्रशासनाला निष्कासनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची ठाणे महापालिका अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पायमल्ली करत भूमाफियांना मोकळे रान दिले आहे.
शास्त्रीनगर येथील या सर्व मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत गाळे आणि चाळी बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच मोठ्या नाल्याच्या बाजूला चाळी बांधून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची परिस्थितीची भीती आहे. या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करा आणि भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अन्यथा प्रभाग समिती आणि पालिका मुख्यालयावर स्थानिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा हणमंत जगदाळे यांनी दिला आहे.